महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । श्रीलंकेचा संघ इतिहासातील सर्वोत्तम फिरकीपटू तयार करण्यासाठी ओळखला जातो. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन हा महान फिरकीपटूंपैकी एक होता. त्याच्यानंतर डावखुऱ्या गोलंदाजांमध्ये रंगना हेराथने चांगली कामगिरी केली. जगातील महान डावखुऱ्या गोलंदाजांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. हा वारसा पुढे नेण्यासाठी आणखी एका गोलंदाजाने अशीच दहशत निर्मान केली आहे. तो म्हणचे प्रभात जयसूर्या (Prabath Jayasuriya).
श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याने दाेन कसाेटीत आपल्या फिरकीच्या जोरावर अनेकांच्या दांड्या गुल केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करणाऱ्या प्रभात जयसूर्या कसोटीच्या दोन्ही डावात प्रत्येकी सहा विकेट्स घेतल्या आणि आता पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात पाच बळी घेत इतिहास रचला आहे. तीन डावात पाच विकेट घेणारा जयसूर्या हा श्रीलंकेचा पहिला आणि जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे.
वयाच्या ३१ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रभातने या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाविरूद्ध दोन्ही डावात प्रत्येकी सहा विकेट आणि पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या डावात पाच बळी असा सलग तीन डावात पाच बळी घेणारा तो श्रीलंकेचा तिसरा फिरकी गोलंदाज ठरला. या बाबतीत त्याने मुथय्या मुरलीधरन आणि रंगना हेरथची बरोबरी केली.