महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै । शिवसेनेचे 19 पैकी 12 खासदार शिंदे गटात सामील झाले, यामधले एक आहेत मावळचे श्रीरंग बारणे (Shreerang Barne). 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांचा पराभव करत श्रीरंग बारणे जाएंट किलर ठरले होते. शिंदेंसोबत गेल्यानंतर बारणे यांनी आता त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
‘भाजपसोबत युती पाहिजे ही आमची भूमिका होती, याची मागणी आम्ही वारंवार केली. पण महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडीचं सरकार आलं. राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) शिवसेनेला संपवायचं आहे, म्हणून हे पाऊल उचललं गेलं,’ असा आरोप बारणे यांनी केला आहे.
‘मावळमध्ये पवार परिवारातल्या माणसाला हरवलं. ठाकरेंना मेसेज केला मग त्यांचा फोन आला, त्यात आपण युतीची मागणी केली. शिवसंपर्क अभियानाचा अहवाल देखील दिला, त्यामध्येही हीच मागणी पुढे आली होती. माझ्या विजयामध्ये भाजपचा वाटा आहे,’ असं वक्तव्य बारणे यांनी केलं.
आपण उद्धव ठाकरेंसोबत शेवटपर्यंत चर्चा करत होतो, त्यांनी सांगितलं तुम्हाला योग्य वाटेल ते करा, मग मी शिंदे गटात जायचा निर्णय घेतला, असं श्रीरंग बारणे यांनी सांगितलं. मावळ मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची मागणी केली गेली, पण त्यावर शिवसेनेने विरोध केला नाही, अशी खंतही बारणे यांनी व्यक्त केली.