महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ ऑगस्ट । श्रावण महिना आणि रविवारची सुटी असा योग साधत भाविकांनी त्र्यंबकेश्वरला अलोट गर्दी केल्याने त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांना तब्बल पाच तास लागले.
कोरोनाचे सावट बर्यापैकी दूर झाल्याने यंदा रविवारी पहाटेपासून भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे आज त्र्यंबकनगरीत दाखल झाले. पोलिस यंत्रणेने पार्किंगचे नियोजन केल्याने नवीन वाहनतळ वाहनांनी फुलले होते. पे आणि पार्क तत्त्वावरील वाहनतळांच्या काही ठिकाणी पाण्याच्या निचर्याची व्यवस्था नसल्याने वाहने गाळात फसली. ती बाहेर काढण्यासाठी भाविकांचा अर्धा दिवस खर्ची पडला.
वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहनतळांच्या जागा निश्चित करत रस्ते बॅरिकेडिंगने बंद करण्यात आले होते. मात्र, त्याचा मनस्ताप स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागला. रिंगरोडवर कैलास राजा नगर गेट पार्किंग म्हणून घोषित केले आणि तो रस्ता गावात जाण्यासाठी बंद ठेवण्यात आला होता. असाच प्रकार जव्हार रस्त्याने वाहने शहरात जाण्यासाठी बंद केली होती. वास्तविक शहराचा विस्तार आता वाढलेला आहे. रिंगरोड आणि जव्हार रस्त्यालगत नववसाहती झाल्या आहेत. नागरिक या वसाहतींमध्ये वास्तव्यास आहेत. व्यवसाय, देवदर्शन, भाजीपाला, बाजारहाट करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांना या रस्त्यांचा वापर करावा लागतो. नेमके तेच रस्ते बंद करण्यात आल्याने रहिवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागली.