महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ ऑगस्ट । गुजराती, राजस्थानी मुंबईत नसते तर इथे पैसाच दिसला नसता असे वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी आता गुजराती नागरिकांना मराठी शिकण्याचा सल्ला दिला आहे. गुजराती, राजस्थानी लोकं नसते तर, महाराष्ट्रात पैसाच दिसला नसता या वादग्रस्त विधानानंतर त्यांनी हा मोलाचा सल्ला दिला असून, आता गुजराती समाज हा सल्ला किती गांभीर्याने घेतो की त्याला विरोध करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भारत हा सुंदर पुष्पगुच्छाप्रमाणे विविधतेने नटलेला देश असून, प्रत्येक राज्याची वेशभूषा, भाषा इत्यादी बाबतीत स्वतंत्र ओळख आहे. मात्र, असे असले तरीही, सर्व भारतीयांना जोडणारे राष्ट्रीय चारित्र्य समान असून, महाराष्ट्रात असताना मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देशातील राष्ट्रीयतेचा भाव वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येकाने आपली सांस्कृतिक ओळख जपताना स्थानिक संस्कृतीशी एकरूप होणे गरजेचे असल्याचे कोश्यारी म्हणाले. आपण स्वतः महाराष्ट्रात आल्यावर आपण स्वत: 5 ते 6 महिन्यांत चांगली मराठी शिकलो असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबईतील गुजराती सांस्कृतिक फोरम सामाजिक, सांस्कृतिक संस्थेतर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 11 प्रसिद्ध गुजराती व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.