एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस कशामुळे एकत्र आलेत ते लवकरच समजेल: धनंजय मुंडे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ ऑगस्ट । देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे एकत्र आले हे कळण्यासाठी थोडावेळ जावा लागेल. शिंदे आणि फडणवीस केवळ ‘ईडी’मुळे एकत्र आलेत का, ते पाहावे लागेल, अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली. सरकारमधील घटक हे समन्वयाने एकत्रित आले आहे की त्यांना ईडीने (ED) एकत्र आणलेय, हे पाहण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल, असे त्यांनी म्हटले. ते शनिवारी बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी धनंजय मुंडे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक शब्दांत निशाणा साधला. गेल्या साडेसात वर्षांपासून देशात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणे हा योगायोग आहे की आणखी काही, हे लवकरच समजेल. हे इन्फोर्समेंट डिरेक्टरटेच सरकार आहे की एकनाथ शिंदेंचं सरकार आहे, असा प्रश्न पडतो. आतापर्यंतची परिस्थिती पाहता ज्या केंद्रीय यंत्रणा देशाच्या सुरक्षेसाठी काम करतात त्यांना भाजपकडून आज स्वत:च्या पक्षाची सत्ता सांभाळण्यासाठी वापरले जात आहे, ही दुर्दैवी गोष्ट आहे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले. त्यामुळे आता भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गोटातून या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असलेल्या विरोधकांनी शिंदे गटाचे आमदार दिसताच घोषणाबाजी केली होती. यामध्ये धनंजय मुंडे आघाडीवर होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार तिथून जात असताना,’ ‘आले रे आले ५० खोके. ५० खोके, एकदम ओके’. ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. यावर शिंदे गटाचे आमदार शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. तर एकनाथ शिंदे यावर चांगलेच संतापले होते. त्यांनी आपल्या गटाच्या आमदारांना विरोधकांच्या घोषणबाजीला जशास तसे प्रत्युत्तर देण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकत्र जमून घोषणाबाजी करत होते. यावेळी एक मजेशीर किस्सा घडला. विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा देत असताना सत्ताधारी पक्षातील आमदार तेथूनच जात होते. यावेळी मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) विधानभवनाच्या जवळ आले. त्यावेळी महाविकास आघाडीतील आमदारांच्या अंगात एकाएकी स्फुरण चढले. त्यांनी संजय शिरसाट यांना बघून,’बघता काय सामील व्हा’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली.

संजय शिरसाट यांना पाहताच धनंजय मुंडे यांच्याही अंगात उत्साह संचारला आणि त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी एक घोषणा दिली. ‘अरे संजय शिरसाटला मंत्रिपदं न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, अशी घोषणा धनंजय मुंडे यांनी दिली. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *