उद्धव ठाकरेंकडे 20 आमदार घेऊन गेलो होतो पण..,, या बंडखोर आमदाराचा मोठा खुलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ ऑगस्ट । ‘ आम्ही शिवसेना वाचवण्याचा प्रयत्न केला, आम्ही गद्दार नाही तर आम्ही खुद्दार आहोत’ असं म्हणत शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (aditya thackery) यांना टोला लगावला. तसंच गुवाहाटीला जाण्याआधी उद्धव ठाकरेंकडे 20 आमदार घेऊन गेलो होतो पण त्यांनी ऐकलं नाही, असा खुलासाही गुलाबराव पाटलांनी केला.

शिवसेनेमध्ये बंडखोरीमुळे आता दोन गट पटले आहे. शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांना सेनेचे नेते आदित्य ठाकरे हे गद्दार असल्याची टीका करत आहे. शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटलांवर जोरदार टीका केली होती.

‘आम्ही जो प्रयत्न केला तो शिवसेना वाचवण्यासाठीच केला मात्र शिवसेना वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न त्यांना आवडलेला नाही. त्यामुळेच ते आमच्यावर टीका करत आहेत. मात्र आम्ही गद्दर नाही तर आम्ही खुद्दार आहोत असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी गद्दार म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

हे सरकार कोसळणारच असेही आदित्य ठाकरे म्हणाले होते त्यावर गुलाबराव पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘हे सरकार शिवसेना आणि भाजप युतीच सरकार आहे. याकडे त्यांनी त्याच दृष्टीने बघावं’ असंही मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

‘शिंदे गटात जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती मात्र त्यावेळी त्यांनी त्याची दखल घेतली असती तर आज वेळ ही आली नसती. सर्वात आधी मी गेलो नाही, 32 आमदार गेल्यानंतर मी शिंदे गटात सहभागी झालो. मी एकटा नाही तर मी २० आमदार घेऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो मात्र त्यावेळी त्यांनी ज्याप्रमाणे शिवाजी महाराज तह करायचे तसा तह केला असता, तर ही वेळ आली नसती. आदित्य ठाकरे हे तरुण होते त्यावेळी त्यांनी अशाच पद्धतीने राज्यभर दौरे करायला हवे होते अशी आमची अपेक्षा होती मात्र त्यांनी तसं केलं नाही’ असंही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

‘आमची त्यावेळची इच्छा अपेक्षा आदित्य ठाकरे आता पूर्ण करत आहेत त्यामुळे देव त्यांचं भलं करो. असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.

जे शिवसेना संपवायला निघाले आहेत त्यांच्यासोबतच शिंदे गटाने युती केली अशी टीका आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या सभेत केली होती. यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी मत व्यक्त केलं. ‘एकनाथ खडसेंनी भाजप आणि शिवसेनेची युती तोडली होती. त्या एकनाथ खडसेंसोबत तुम्ही बसले. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी भाजपसोबत युती केली तर आम्ही गद्दार काय.. नाही आम्ही खुद्दारच आहोत, असंही गुलाबराव पाटलांनी ठणकावून सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *