![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांना आस लागली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवसाची सगळे जण आतुरतेने वाट पाहत असतात. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती असलेल्या गणेशाचे आगमन यंदा 31 ऑगस्टला लाडक्या भक्तांकडे होणार आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाच्या मूर्तिची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. देशभरासह अन्य देशातही मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जातो. गणपती बाप्पाच्या आगमनाची यंदाची तारीख, महत्व आणि पूजेचा शुभ मुहूर्त याविषयी जाणून घेऊ या.
गणपतीचे आगमन –
भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या चतुर्थीला सिद्धी विनायक व्रत असेही म्हटले जाते. या दिवशी घरोघरी गणरायाचे आगमन होते आणि अबाल-वृद्ध भक्तीभावाने श्रीगणेशाच्या मूर्तीची पूजा करतात. या वर्षी महिन्याच्या शेवटी बुधवारी 31 ऑगस्टला, भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी आहे. म्हणजेच यंदा 31 ऑगस्टला गणपती बाप्पा सर्वत्र विराजमान होतील. बुधवारी गणेश चतुर्थी आल्याने या व्रताचे महत्त्व आणखी वाढले आहे, कारण गणपती बाप्पा स्वतः बुधवारचा देव आहे, अशी मान्यता आहे.
शुभ मुहूर्त आणि वेळा –
भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी म्हणजेच गणेश चतुर्थी 30 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 34 मिनिटांनी सुरू होईल. तर समाप्ती भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 23 मिनिटांनी होईल. गणेश चतुर्थीला रवी योग आहे. या दिवशी गणपती बाप्पा आपल्यासोबत शुभ रवियोग घेऊन येणार आहेत. या योगामध्ये सर्व अशुभ योगांचे प्रभाव नष्ट करण्याची ताकद असते. म्हणजेच सर्व दु:खे, विघ्न, अडचणी दूर करून भक्तांना प्रसन्न करण्यासाठी गणरायाचे आगमन होणार आहे.