महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १२ सप्टेंबर । टी ट्वेन्टी वर्ल्डकपच्या (T 20 Wolrd Cup) तोंडावर भारतीय संघाला आशिया चषकात अपयश आल्यानंतर संघात बदलाचे वारे वाहतायेत. कारण महिनाभरावर येऊन ठेपलेला टी ट्वेन्टी वर्ल्डकप भारताच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे. मागील टी ट्वेन्टी वर्ल्डकपमध्येही भारतीय संघाला अपयश आलं होतं. त्यामुळे यंदा काहीही करुन वर्ल्डकप जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ वर्ल्डकपच्या रणमैदानात उतरणार आहे. त्याच अनुषंगाने टी ट्वेन्टी विश्वचषकातील महत्त्वाच्या संभाव्य खेळाडूंना विश्रांती देऊन त्यांच्याजागी आफ्रिका दौऱ्यात नव्या भिडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेविरोधात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाचा तडाखेबंद फलंदाज शिखर धवनकडे भारतीय संघाची धुरा सोपविण्यात येणार आहे तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या ऐवजी व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाबरोबर मार्दगर्शक म्हणून असणार आहे.
टी ट्वेन्टी विश्वचषकापूर्वी टीम इंडिया दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरोधात एकदिवसीय आणि टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका खेळणार आहे. येत्या काही दिवसांत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या महत्त्वाच्या खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विश्रांती दिली जाईल आणि संघाची धुरा शिखर धवनच्या खांद्यावर दिली जाईल. एएनआयने हे वृत्त दिलं आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ २८ सप्टेंबरपासून भारत दौऱ्यावर आहे. २८ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने भारत आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान खेळवले जाणार आहेत. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा, विराट कोहली आणि महत्त्वाच्या खेळाडूंना टी ट्वेन्टी विश्वचषकाआधी खेळल्या जाणाऱ्या आफ्रिकेविरोधातील एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी त्यांना थोडा ब्रेक मिळेल. पर्यायाने शिखर धवन एकदिवसीय संघाचे नेतृत्व करणार आहे. याआधीही शिखर धवनने भारतीय संघाचे नेतृत्व केलं आहे. श्रीलंका दौऱ्यात आपल्या यशाचा डंका त्याने पिटला होता.