इथल्या तरुणांनी काय फक्त दहिहंड्या फोडायच्या का?: बाळासाहेब थोरात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ सप्टेंबर । वेदांत आणि फॉक्सकॉन महाराष्ट्रात १.५८ लाख कोटी रुपयांती गुंतवणूक करणार होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ९०% चर्चाही केली होती. पण सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरातला कसा गेला, याचे नेमके गौडबंगाल काय हे जनतेला कळाले पाहिजे. महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांच्या पहिल्या पसंतीचे राज्य आहे. मविआ सरकारने अडीच वर्षांच्या काळात मोठी गुंतवणूक राज्यात आणली व त्यातून राज्यातील लाखो तरुणांच्या हाताला काम दिले. परंतु मविआ सरकार जाताच अडीच महिन्यात असे काय झाले की फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला?, असा सवाल ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीसांना विचारला.

फॉक्सकॉन-वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? असा सवाल उपस्थित करत हा प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याची कोणतीच माहिती राज्य सरकारला समजली नाही का? हा प्रकल्प महाराष्ट्रातच रहावा यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने काय प्रयत्न केले?, असे सवालही बाळासाहेब थोरात यांनी विचारले आहेत.

मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी BJP व केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आले आहे. फडणवीस सरकार राज्यात असताना मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रही गुजरातला हलवण्यात आले. अनेक महत्वाचे प्रकल्प व कार्यालयेही गुजरातला हलवण्यात आली, याकडेही बाळासाहेब थोरात यांनी लक्ष वेधले.

अहमदाबाद जिल्ह्यात एक हजार एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी ‘वेदांत’ची गुंतवणूक ६० टक्के असेल, तर ‘फॉक्सकॉन’ची गुंतवणूक ४० टक्के असणार आहे. या प्रकल्पातून पुढील दोन वर्षांत सेमीकंडक्टरचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईल, असे ‘वेदांत’चे अध्यक्ष अनिल अगरवाल यांनी सांगितले. गुजरात सरकारसमवेत करारावर स्वाक्षरी केल्यानंतर ते बोलत होते.

गेल्या वर्षी सेमीकंडक्टरची मोठी टंचाई देशात निर्माण झाली होती. याचा फार मोठा फटका वाहन उद्योगाला बसला होता. सेमीकंडक्टर चीन आणि तैवान येथून आयात केले जातात. या दोन्ही देशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशात सेमीकंडक्टरचे उत्पादन होणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक सवलत योजना आणली होती. यामध्ये उत्पादनसंलग्न सवलत योजनाही (पीएलआय) लागू करण्यात आली होती. याचा फायदा घेऊन सेमीकंडक्टर उत्पादन करण्यासाठी वेदान्त-फॉक्सकॉन यांनी संयुक्त अर्ज केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *