महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० सप्टेंबर । औरंगाबाद शहराला पैठण येथील जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणात मुबलक पाणी असल्याने शहराला पाणी दिले जाते. दरम्यान काल अचानक शहराचा पाणीपुरवठा बंद पडला ही पाणीपुरवठा अचानक कसा काय बंद पडला याचा शोध घेण्यात आला याचे कारण सगळ्यांनाच अचंबीत करणारे होते. चक्क एका उंदरामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला होता.
पंपगृहातील फिडरमध्ये उंदीर घुसल्याने स्पार्किंग होऊन वीजपुरवठा खंडित झाला आणि त्यामुळे पंपिंग बंद झाल्याचे समोर आले. त्यानंतर लगेचच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, या घटनेमुळे अकरा तास पाणीपुरवठा बंद राहिला. पंप क्रमांक 4 च्या फिडरमध्ये उंदीर गेल्यामुळे पाणीपुरवठा बंद झाल्याचे खरे कारण समोर आले.
औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 100 एमएलडी आणि 56 एमएलडीच्या दोन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यरत आहेत. दोन्ही पाणी योजनांसाठी जायकवाडी धरणात पंपगृह उभारण्यात आलेले आहे. या पंपगृहात सोमवारी पहाटे 2 वाजून 5 मनिटांनी अचानक विद्युत पुरवठा खंडित होऊन पूर्ण पंपींग बंद झाली. शंभर एमएलडी योजनेच्या पंपगृहातील मेन पॅनलची तपासणी केली असता पंप क्रमांक 4 च्या फिडरमध्ये उंदीर गेल्यामुळे स्पार्किंग होऊन फेज टू फेज अर्थ फॉल्ट झाला.
सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याचे आढळले. त्यानंतर नवीन जायकवाडी पंपगृह येथील पुरवठा बायपास करून 56 एमएलडी योजना पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
100 एमएलडी योजना संपूर्ण काम झाल्यानंतर दुपारी 1 वाजता सुरू झाली. परिणामी 56 एमएलडी योजनेवर 2तास 15 मिनिटे आणि 100 एमएलडी योजनेवर 11 तास 5 मिनिटे हा पाणीपुरवठा बंद राहिला. या काळात धरणातून पाणी उपसा होऊ शकला नाही. परिणामी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला.
दरम्यान शहरातील नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. एका उंदराने अख्या शहराचा पाणीपुरवठा बंद केल्याची माहिती समजताच शहरातील लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता.