Weather Rain Update : परतीचा पाऊस ; राज्यात या भागांत विजाच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ ऑक्टोबर । मागच्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले होते. अखेर परतीचा पाऊस जाण्याची शक्यता आहे. राज्याच्या विविध भागांत मंगळवार (दि. 11) पर्यंत पावसाची हजेरी कायम राहणार आहे. सर्वच भागांत कमी-अधिक प्रमाणात वादळी वारे, मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. देशाच्या पश्चिमेकडील भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या विविध भागांत पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच याच भागात चक्रीय स्थितीदेखील कायम आहे. त्यामुळे राज्यात पाऊस सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांत विजाच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यांत 11 ऑक्टोबरपर्यंत; तर मुंबई परिसरात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे; पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यात पुढील 3 ते 4 दिवस ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, परभणी, बीड, नंदूरबारसह विदर्भात तुरळक भागात पावसाची शक्यता आहे.

दरम्यान पुढचे 5 दिवस राज्यात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

तर आज (दि.09) ऑक्टोबर रोजी पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे, ठाणे, अहमदनगर, सोलापूर, लातूर, जालना, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नाशिक, नंदूरबार या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील काही भागांत 11 ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि परिसरात आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. डोंबिवलीमध्ये सकाळपासून 94.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे, मुंबई मध्य आणि पूर्व उपनगरातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत.

देशातील अनेक भागात सध्या पाऊस सुरु आहे. गोव्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, पुढील 3 ते 4 दिवस कर्नाटकचा अंतर्गत भाग, आंध्र प्रदेशच्या किनारी भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. सध्या मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरु आहे. आग्रा, ग्वाल्हेर या भागातून मान्सून माघारी परतला आहे.

पावसाला पोषक हवामान असल्याने उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यात राज्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस सुरूच आहे. कमी कालावधीत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पाणीच पाणी होत असून, नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. सततच्या पावसाने पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *