महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – मुंबई: भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या ट्विटमध्ये पंकजा यांनी भाजपच्या या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नसल्याचे म्हटले आहे. भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर अनेकजण फोन करुन दु:ख व्यक्त करतायत. पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,’तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’ बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद, असे पंकजा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
आईंना,ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही' बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद!
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) May 8, 2020
विधानसभा निवडणुकीवेळी भाजप नेतृत्त्वाने चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना उमेदवारी नाकारली होती. तर पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघात पराभव झाला होता. त्यामुळे हे सर्व नेते पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत होते. एकनाथ खडसे यांनी अलीकडे राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याची इच्छाही बोलून दाखवली होती. तर काही महिन्यांपूर्वी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावर जोरदार शक्तीप्रदर्शनही केले होते. त्यामुळे भाजपकडून या नेत्यांना विधानपरिषदेवर पाठवले जाईल, असा अंदाज होता. मात्र, भाजप नेतृत्त्वाने सगळ्यांनाच धक्का देत या प्रस्थापित नेत्यांना बाकावरच बसवून ठेवले आहे.