महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३० डिसेंबर । सुट्ट्या सुरु झाल्यात आणि टोल नाक्यांवर ही गर्दी पहायला मिळत आहे. विमानतळांवर तर एसटी स्टँड किंवा लोकलला गर्दी असते तशी गर्दी दिसतेय. अशावेळी लोकांना प्रवासात असताना टोल नाक्यांवर बराच वेळ थांबावे लागत आहे. टोल नाक्यावर १०० मीटरच्या पिवळ्या पट्ट्याचा नियम आहेच, परंतू तो पाळला तर कधीच जात नाही. असाच एक नियम १० सेकंदांचा देखील आहे. त्यानंतर तुम्हाला फुकटात टोलवरून सोडावे लागते.
भारतीय राजमार्ग प्राधिकरण एनएचएआयने मे २०२१ मध्ये टोलनाक्यांसाठी दिशानिर्देश जारी केल होते. टोल नाक्यावर वाहनाचा सर्व्हिस टाईम हा १० सेकंदांपेक्षा जास्त असू नये. जास्त ट्रॅफिक असेल तेव्हा देखील १० सेकंदांपेक्षा जास्तीचा वेळ लागू नये, असे म्हटले गेले आहे.
सर्व्हिस टाईम म्हणजे जेवढा वेळ पुढचे वाहन टोल देऊन गेल्यावर आपले वाहन टोल देण्यासाठी टोलच्या गेटवर जाते तेव्हापासून टोल कापला जाईपर्यंतचा वेळ हा १० सेकंदाच्या आत असावा. य़ाचा उद्देश हा टोल प्लाझावर वाहनांचा वेटिंग टाईम कमी करणे हा होता. तसेच १०० मीटरवर पिवळी पट्टी असावी. वाहनांची रांग त्यापेक्षा जास्त असू नये, असल्यास ती वाहने टोल न आकारताच सोडण्यात यावीत, असा नियम आहे.
परंतू हे दिशानिर्देश टोल नाक्यांवर पाळले नाहीत तर काय केले जाईल? असा प्रश्नच सर्वांना पडलेला आहे. कारण हे दोन्ही नियम आजतागायत तरी काही पाळले गेलेले नाहीत. टोल नाक्यावर याबाबत विचारले असता उडवाउडवीची, दादागिरीची उत्तरे दिली जातात, यामुळे वाहन चालक मनस्ताप करून घेण्यापेक्षा टोल देणेच पसंत करतात.
फास्टॅग आल्यापासून टोल प्लाझावर वेटिंग टाईम खूप कमी झाला आहे. फास्टॅग आला तरी देखील काही कारणास्तव रांगा १०० मीटरपेक्षा जास्त लांब लागल्या तर १०० मीटरच्या अंतरातील गाड्या टोल न घेताच सोडाव्या लागतील, असे NHAI ने म्हटले होते. टोल नाक्यांवर भ्रष्टाचार होऊ नये, वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी फास्टॅग आणण्यात आला होता. तरीही कोणत्याही नियमांचे पालन होत नाही हे विशेष.
काय आहेत हे दोन्ही नियम….
राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या टोल प्लाझावर 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबू नये. एखाद्या वाहनाला 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागल्यास ते टोल टॅक्स न भरता पुढे जाऊ शकते.
टोल प्लाझावर 100 मीटरपेक्षा जास्त लांब वाहनांची रांग नसावी आणि वाहतूक अखंडितपणे सुरू असावी. 100 मीटरपेक्षा जास्त रांग असल्यास टोल न भरता वाहनांना जाऊ दिले जाईल. प्रत्येक टोल लेनला टोल बूथपासून १०० मीटर अंतरावर पिवळा पट्टा असावा.