महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ४ जानेवारी । वीज वितरणाच्या खासगीकरणाला विरोध यासह ठाणे, मुलुंड, भांडुप, नवी मुंबई, बेलापूर, पनवेल, तळोजा व उरणमध्ये अदानी वीज कंपनीला वितरणाचा परवाना देऊ नये आदी मागण्यांसाठी ४ जानेवारीपासून (मंगळवारी रात्री १२ वाजेपासून) राज्यातील ८६ हजार वीज कामगार, अभियंते, अधिकारी व ४२ हजार कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षकांनी ७२ तासांचा संप पुकारला आहे.
परिणामी, राज्यभरातील वीज यंत्रणा कोलमडून पडण्याची भीती व्यक्त होत आहे. संपात ३१ संघटनांचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपकाळात राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने देखील कंबर कसली आहे. वीज कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामध्ये त्यांच्या कोणत्याही आर्थिक मागण्या नाहीत. तर जनतेच्या मालकीचा वीज उद्योग टिकला पाहिजे. तो भांडवलदारांना विकता कामा नये. भांडवलदार नफा कमविण्याच्या उद्देशाने वीज वितरण क्षेत्रात येत आहेत, असा दावा महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीने केला आहे.
४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संपात सहभागी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
महावितरणतर्फे नियुक्त करण्यात आलेल्या ज्या एजन्सी संपकाळात काम करणार नाहीत, त्यांना बडतर्फ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वीज गेली तर काय कराल?
टोल फ्री क्रमांक
१८००-२१२-३४३५
१८००-२३३-३४३५
/१९१२/ १९१२०