महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ जानेवारी । देशातल्या सरकारी माध्यमांना प्रोत्साहन म्हणून केंद्राने महत्त्वाची पावले उचलली आहे. देशातल्या ८० टक्क्यांहून अधिक जनतेसाठी ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच आकाशवाणीच्या आणखी वाहिन्या सुरू करण्याचं नियोजन आहे.
तसंच केंद्र सरकारने दुर्गम भागामध्ये ८ लाख डीडी सेट टॉप बॉक्स मोफत वाटण्याची घोषणा केली आहे. आदिवासी जनता, नक्षलवादी, तसंच सीमावर्ती भागांमध्येही ही सुविधा पुरवण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून यासाठी जवळपास २,५३९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
२०२२-२६ या कालावधीसाठी ही तरतूद कऱण्यात आल्याचं माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं. प्रसारभारतीच्या विकासासाठीचा हा प्रस्ताव आर्थिक व्यवहारासंबंधीच्या कॅबिनेट समितीनेही स्विकारला आहे. यामध्ये आकाशवाणी आणि डीडी (दूरदर्शन) दोन्हीच्या विकासाबद्दल नियोजन कऱण्यात आलं आहे.
सध्या दूरदर्शनच्या ३६ वाहिन्या आहेत, ज्यामध्ये २८ वाहिन्या प्रादेशिक भाषेतल्या आहेत. आकाशवाणीची सध्या ५०० हून अधिक प्रसारण केंद्रं सक्रीय आहेत. भौगोलिकदृष्ट्या ६६ टक्के भागामध्ये आकाशवाणी विस्तारली असून ८० टक्के लोकसंख्येपर्यंत हे जाळं पोहोचलं आहे.