महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ जानेवारी । गेल्या सहा महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. नववर्षात याप्रकरणाची सुनावणी वेगाने होऊन निकाल लागेल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या वादात एखादा ठोस निर्णय देईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याप्रकरणाची सुनावणी १४ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. परिणामी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आणखी महिनाभराने लांबणीवर पडला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागून शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा केला होता. परंतु, आता पुढील सुनावणी फेब्रुवारीच्या मध्यावर होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लागण्याची शक्यता फारच कमी आहे. यावर आता ठाकरे गट आणि शिंदे गटाचे नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.
सरन्यायाधीश वाय.एस. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर आजची सुनावणी झाली. ठाकरे गटाने नबम रेबिया प्रकरणाचा दाखला देत हे प्रकरण सात सदस्यीय खंडपीठाकडे सोपवले जावे, अशी मागणी केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयात आज काय युक्तिवाद होणार आणि काय निर्णय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, आज सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांचा युक्तिवाद झाला आणि सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणात पुढची तारीख दिली.