राज्यात वेळेआधीच २ जूनला मान्सूनचे आगमन ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन -विशेष प्रतिनिधी -ओमप्रकाश भांगे – पुणे -:-लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या प्रदूषणमुक्‍त वातावरणावर मान्सून मेहरबान झाला असून, तो यंदा वेळेआधीच सक्रिय होणार आहे. मान्सून दरवर्षी 15 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो; मात्र यावर्षी 8 ते 10 जुलैदरम्यान देश व्यापेल, तर राज्यात 2 जूनपर्यंत पोहोचेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्‍त केला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभाग दिल्लीने मान्सून 16 मे पर्यंत बंगालच्या उपसागरासह अंदमान आणि निकोबारमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच स्कायमेट व सौर अभ्यासकांच्या मतेही प्रथमच मान्सून लवकर दाखल होत असल्याचा अंदाज व्यक्‍त केला आहे.

कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी पहिल्यांदाच प्रदूषणमुक्‍त हवामान असल्यामुळे मान्सूनच्या प्रक्रियेने वेग धरला आहे. नेहमी मान्सून 17 ते 20 मे च्या दरम्यान बंगालच्या उपसागरासह अंदमान तसेच निकोबार बेटांवर दाखल होत असतो. यावर्षी मान्सून 28 ते 30 मे च्या आसपास केरळमध्ये दाखल होईल, तर 2 जूनपर्यंत तळकोकण, 3 ते 4 जून मुंबई तर 5 जूनच्या आसपास मध्य महाराष्ट्रात मान्सून पोहोचेल. गेल्या वर्षी आठ चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन लांबत गेले. याउलट यावर्षीची स्थिती वेगळी असून मान्सून वेळेच्या आधीच सर्वत्र दाखल होणार आहे. सूर्याच्या तापमानामुळे हवेचा दाब मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे पावसामध्ये काही काळ खंड राहणार आहे. तरीदेखील पाऊस चांगलाच राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘स्कायमेट’ या हवामान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार यंदा अरबी समुद्रात एकही चक्रीवादळ नाही. त्यामुळे ‘अल् निनो’, इंडियन ओशन डायपोल (आयओडी) आणि मेडियन ज्युलियन ऑसिलेशन (एम.जे.ओ.) स्थिर आहेत. 20 मे पासून चक्रीय स्थिती बदलेल. त्यामुळे मान्सून बंगालचा उपसागर तसेच अंदमान निकोबार बेटांवर दाखल होईल.

सौर अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांच्या मते जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्याच्या सर्वच भागांत पाऊस चांगला राहील. मात्र, त्यानंतर पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे; तर ऑक्टोबर महिन्यापासून नोव्हेंबरपर्यंत परतीचा पाऊस देखील चांगला बरसण्याची शक्यता आहे. उच्च तापमानामुळे अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मान्सूनचे आगमन दरवर्षीपेक्षा वेळेच्या आधी होणार असून हा मान्सून 18 ते 20 मे दरम्यानच बंगालच्या उपसागरासह अंदमान, निकोबारमध्ये दाखल होईल.

‘राज्यात दुष्काळी पट्ट्यात पहिल्या टप्प्यात पाऊस कमी पडणार आहे; मात्र सष्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत धुळे, नाशिक, मराठवाडा तसेच विदर्भाच्या काही दुष्काळी भागात परतीचा पाऊस मात्र सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे.’
– डॉ. रामचंद्र साबळे, कृषी हवामानतज्ज्ञ आणि राज्य सरकारचे माजी हवामान सल्‍लागार

*👉असे होणार मान्सूनचे आगमन:-*

*➖कोकण :-2 जून*
*➖मुंबई :- 2 ते 4 जून*
*➖पुणे :-8 ते 10 जून*
*➖सोलापूर :-8 ते 10 जून*
*➖कोल्हापूर :-9 ते 11 जून*
*➖औरंगाबाद :-9 ते 11 जून*
*➖नागपूर :- 10 ते 12 जून*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *