महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ फेब्रुवारी । अजय विघे | कोपरगाव शहर नेहमीच पाणी या विषयावर चर्चेत असते, कधी दूषित पाणी तर कधी आठ, दहा तर कधी वीस दिवसाआड पाणीपुरवठा हे या शहराला नवीन नाही. अशातच कोपरगाव नगर परिषदेची मालमत्ता व पाणीपट्टीची मोठी थकबाकी वाढली आहे. त्यातच नगरपरिषदेमध्ये सध्या प्रशासक राज असल्याने प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावीं नवनवीन संकल्पना राबवीत असतात. अशाचप्रकारे शुक्रवारी त्यांनी नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, | कर्मचारी यांची थकबाकी वसुलीसाठी संपूर्ण शहरात ढोल वाजवत जनजागृती केली. त्याची चर्चाही खूप झाली. शनिवारी काही ज्येष्ठ नागरिक एका ठिकाणी बसलेले असताना त्यांच्यात खूप गप्पा रंगल्या. एका आजोबांनी ढोल वाजविण्याचा विषय घेतला. त्यात दुसरे आजोबा लगेच म्हणाले. ही नगरपालिका कर म्हणून वर्षांची पट्टी घेते आणि आठआठ दिवसाला पाणी देते आणि वसुलीसाठी आमच्या दारात ढोल वाजवताय काय ? आम्हाला दररोज पाणी द्या नाहीतर आम्हीच तुमच्या दारात ढोल वाजवू, अशी आजोबांची आक्रमकता पाहून सर्वांनी टाळ्या वाजविल्या.