महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १३ फेब्रुवारी । २०१९ मध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेअजित पवार यांनी पहाटे सरकार स्थापन केले होते. हे सरकार फक्त काही तासच चालले होते, यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘२०१९ मध्ये आम्ही घेतलेल्या शपथविधी संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माहिती होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळाच खळबळ उडाली आहे.
टीव्ही९ या वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. ‘२०१९ मध्ये आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. या सरकार संदर्भात सर्व चर्चा झाल्या होत्या. पण, ऐनवेळेला आमच्यासोबत विश्वासघात करण्यात झाला. पहिला विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केला आणि दुसरा विश्वासघात पवारांनी केला असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘महाविकास आघाडी सरकार मला तुरुंगात टाकू शकले नसते, पण त्यांनी मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मला तुरुंगात टाकण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सुपारी दिली होती, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी कधीही पोलीस विभागात अपमानीत केल नाही. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांच माझ्याबाबतीत प्रेम होते, त्यामुळे त्यांनी केलेल्या प्रयत्नांची मला माहिती मिळायची. त्यांनी मला तुरुंगात टाकण्यासाठी जंग जंग पछाडले, असा आरोपही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
२०१९ च्या पहाटेच्या शपथविधी संदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही लोकमतच्या एक कार्यक्रमात विचारण्यात आला होता, यावेळी अजित पवार यांनी या शपथविधी संदर्भात बोलण्यास नकार दिला होता. ‘मी या विषया संदर्भात बोलणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले होते.