राहुल गांधी अपात्र, वायनाडमध्ये पोटनिवडणूक कधी होणार? निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणाले…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ मार्च । मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. लोकसभा सचिवालयाने २४ मार्चला अधिसूचना काढून त्यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब केलं. सूरत न्यायालयाच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींना अपात्र ठरवून काँग्रेसला मोठा राजकीय धक्का दिला.

लोकसभा सचिवालयाच्या अधिसूचनेमुळे वायनाड लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राजीव कुमार यांनी आज ( २९ मार्च ) कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. तेव्हा राहुल गांधींच्या अपात्रतेमुळे वायनाड येथे पोटनिवडणूक कधी लागणार? असा सवाल प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विचारला. त्यावर राजीव कुमार म्हणाले, “जागा रिक्त झाल्यानंतर निवडणूक जाहीर करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी असतो. न्यायालयाने ३० दिवसांचा वेळ दिला आहे. कोणतीही घाई नाही,” असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं.

लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव?
दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर २४ तासांतच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना अपात्र ठरवलं. या निर्णयामुळे काँग्रेस आणि विरोधी पक्ष लोकसभा अध्यक्षांविरोधात आक्रमक झाला आहे. विरोधी पक्ष ओम बिर्लांविरूद्ध अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत आहे. सोमवारी ( ३ मार्च ) लोकसभेत हा ठराव आणणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *