महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ एप्रिल । राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना कधी पावसाच्या सरी तर कधी कडाक्याच्या उन्हाच्या झळा बसत आहे. एप्रिल महिना संपत आला तरी, अजूनही राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे.
हवामान खात्याने शुक्रवारी (२८ एप्रिल) मराठवाडा, विदर्भात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे आधीच अवकाळीची धास्ती धरून बसलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पश्चिम विदर्भापासून, मराठवाडा, उत्तर अंतर्गत कर्नाटक ते उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाची स्थिती कायम असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
गुरुवारी (ता. २७) राज्यात सोलापूर येथे ३९ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमान, तर यवतमाळ येथे १६.५ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. सध्या मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी वादळी पाऊस व गारांची स्थिती कायम आहे.
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील बीड, नांदेड, यवतमाळ, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, अमरावती, भंडारा, गोंदिया. अवकाळी पाऊसासह जोरदार गाटपीट होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दुसरीकडे पुण्यासह सातारा, सांगली, नाशिक, नगर, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार, चंद्रपूर, वाशीम, लातूर, बुलडाणा, गडचिरोली, धाराशिव, अकोला, वर्धा या १७ जिल्ह्यांमध्येही पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.