आता पत्रकारांनाही ५० लाखांचं विमा कवच, आरोग्यमंत्र्यांची घोषणा!

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – नांदेड- विशेष प्रतिनिधी: संजीवकुमार गायकवाड – महाराष्ट्रात कोरोनाविरोधात (coronavirus) लढण्यासाठी आरोग्य सेवक, पोलीस कर्मचाऱ्यांसोबतच पत्रकारही रस्त्यांवर उतरून वार्तांकन करत आहेत. त्यामुळे त्यांनाही ५० लाखांचं विमा कवच देण्यात येणार असल्याची घोषणा मा. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. माध्यमांशी बोलताना टोपेंनी ही माहिती दिली.

आतापर्यंत अनेक पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे. पत्रकार, फोटो जर्नलिस्ट, व्हिडिओ जर्नलिस्ट आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांपर्यंत माहिती पोहोचवत आहेत. त्यामुळे त्यांनाही विमा कवच मिळायला हवं अशी मागणी होत होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ५० लाखाचं विमान कवच देण्यात येणार आहे.

“केवळ डॉक्टर आणि पोलीसच नाही तर पत्रकारही करोना काळात कर्तव्य बजावत आहेत. दुर्देवानं जर कोणी कर्तव्य बजावताना बाधित झाले तर घाबरून जाण्याचं कारण नाही. तुम्ही बरे व्हालचं. दुर्देवानं कर्तव्य बजावताना एखाद्या पत्रकाराचा करोनामुळे मृत्यू झाला तर त्यालाही ५० लाखांचं विमा कवच असणार आहे. तो केवळ शासकीय कर्मचाऱ्यांपुरता नाही,” असं टोपे म्हणाले.

कसे मिळणार विमा कवच?

“जर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिलं की हा पत्रकार आहे आणि त्याला कर्तव्य बजावत असताना करोनाची लागण झाली. तसंच यात दुर्देवानं त्याचा मृत्यू झाला आहे, तर त्याला हे कवच मिळणार आहे. तसंच कोरोनाचं काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला करोनाची बाधा झाली आणि त्याच्यावर हा प्रसंग ओढावला तर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिल्यावर त्यांना ५० लाखांचं हे विमा कवच मिळणार आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, शिवसेना नेत्या डॉ. मनिषा कायंदे यांनीदेखील पत्रकारांना विमा संरक्षण जाहीर केल्याबद्दल राजेश टोपे यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *