आरटीई प्रवेश प्रक्रिया अद्याप संथ गतीने

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३ मे । शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणारी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सध्या कासवगतीने सुरू आहे. आतापर्यंत केवळ 36 हजार 678 विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित आहेत. त्यामुळे शाळांमध्ये मुलांचे प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ मिळेल का, अशी विचारणा राज्यातील पालकांकडून होत आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेतून आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव असणार्‍या 25 टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्यात येतो. त्यानुसार यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत राज्यातील 8 हजार 823 शाळांमध्ये प्रवेशासाठी 1 लाख 1 हजार 846 जागा उपलब्ध आहेत.

या जागांवर प्रवेशासाठी 3 लाख 64 हजार 413 पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज दाखल केले होते. त्यानुसार प्रवेशाच्या निवड यादीसाठी पहिली लॉटरी काढण्यात आली असून, त्यामध्ये 94 हजार 700 मुलांना प्रवेश जाहीर झाले आहेत. या मुलांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी 8 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, प्रवेश प्रक्रियेचा संथ वेग पाहता 36 हजार 678 मुलांचे प्रवेश निश्तिच झाले आहेत. ही संख्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. अनेक पालकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने, प्रवेश घेण्यात अडचणी उद्भवत आहेत. अशा परिस्थितीत उर्वरित मुलांच्या कागदपत्रांची पडताळणी करून, त्यांचे प्रवेश करण्यासाठी अधिकचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुलांचा प्रवेश घेण्यासाठी मुतदवाढ मिळेल का, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

प्रतीक्षा यादीतील मुलांच्या वाट्याला प्रतीक्षाच…
पहिल्या लॉटरीनुसार 81 हजार 129 मुले ही प्रतीक्षा यादीत आहेत. निवड यादीतील मुलांचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर, प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेशाची संधी मिळते. त्या वेळी पालकांच्या मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठविण्यात येतात. मात्र, सध्याच्या प्रवेश प्रक्रियेचा वेग पाहता प्रतीक्षा यादीतील मुलांच्या पालकांना मेसेजसाठी वाट पाहावी लागणार असल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *