महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ जून । ओ डिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी मोठी रेल्वे दुर्घटना घडली. कोरोमंडल एक्सप्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले. यानंतर दुसऱ्या ट्रॅकवरून विरुद्ध दिशेने येणारी दुसरी एक ट्रेन धडकली. या दोन्ही ट्रेनचे 17 डबे रुळावरून घसरले. अपघातात 288 हून जास्त जणांचा मृत्यू झाला असून 900 पेक्षा जास्त जण जखमी आहेत.
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी हा भीषण अपघात झाला. कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन कोलकात्यातील शालिमार रेल्वे स्टेशनहून दुपारी साडे तीन वाजता निघाली होती. ट्रेन शनिवारी सायंकाळी पाच वाजता चेन्नईला पोहोचणार होती. पण त्याआधीच भयंकर अपघात झाला. आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून हा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
कोरोमंडल एक्सप्रेस हावडातील शालीमार स्टेशनवरून चेन्नई सेंट्रलच्या दिशेने जात होती. यावेळी ट्रेन 6.55च्या सुमारास बाहानगा बाजार स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाली. यामुळे कोरोमंडलचे चार डबे रेल्वे रुळावरून घसरले. त्याचवेळी 7.00 वाजता च्या सुमारास दुसरी एक ट्रेन विरुद्ध दिशेच्या ट्रॅकवरून जात होती. त्या ट्रेनला कोरोमंडल एक्सप्रेसचे घसरलेले डबे धडकले. यानंतर दोन्ही ट्रेनचे एकूण 17 डबे रुळावरून घसरल्यानं अपघातातील मृतांचा आकडा वाढला.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. केंद्र सरकारने अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमी असलेल्यांना 50 हजार रुपये देणार असल्याचं सांगितलं. अपघातानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी यांच्यासह ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शोक व्यक्त केला.