महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुन । समृद्धी महामार्गावरील अपघातांचं सत्र सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन भीषण अपघात झाले आहेत, या तिन्ही अपघातामध्ये एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
समृद्धी महारगावर पहिल्या अपघात चेनेज क्रमांक 283 जवळ झाला आहे. एका कारमधील तीन प्रवासी लघुशंकेसाठी थांबले असताना त्यांच्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. या भीषण धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दुसऱ्या अपघातात ट्रकचालकाला झोप लागल्यामुळे ट्रक महामार्गाखाली कोसळला. तर यामध्ये ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. तिसऱ्या अपघातात धुळ्याहून नागपूरकडे जाणारी कार उलटली, यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यापासून महामार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी या दरम्यान प्रवासासाठी लागणार वेळ कमी झाला आहे. मात्र, सतत होणाऱ्या अपघातांमुळे आणि मृतांची संख्या पाहता चिंता व्यक्त केली जात आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही.