संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर केदार दिघेंची प्रतिक्रिया; आव्हान देत म्हणाले…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुन । दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत पुन्हा एकदा संशय निर्माण करण्यात आला आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. “आनंद दिघेंचा अपघात नव्हे खून झाल्याचा संशय आहे”, असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केले होते. यादरम्यान, धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी शिंदे गटातील नेत्यांना थेट आव्हान दिले आहे. “तुमच्याकडे पुरावे असतील तर सादर करा, आनंद दिघे यांचा पुतण्या या नात्याने मी त्यामागे ठामपणे उभा राहीन”, असे केदार दिघे म्हणाले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं.

“मला अत्यंत दुःखं वाटतं की दिघे साहेबांच्या पश्चात गेल्या २२ वर्षांत त्यांच्या मृत्यूचा विषय कधी कोणी काढला नाही. कधीही कोणी याबाबतीत बोललं नाही. अचानक निवडणुका येतात किंवा स्वतःचं अस्तित्व दाखवायचं असतं तेव्हा दिघे साहेबांचा विषय काढला जातो. संजय शिरसाटही असं म्हणाले की आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत चौकशी व्हावी. माझी थेट मागणी आहे की, तुमच्याकडे काही असेल तर, गुरुवर्य आनंद दिघे यांना मी अग्नी दिला आहे. मी त्यांचा पुतण्या आहे. त्यामुळे माझं हे कर्तव्य आहे की दिघेसाहेबांच्या बाबतीत कोणतीही चुकीची घटना घडली असेल तर त्यासाठी मी ठामपणे आणि खंबीरपणे उभा राहायला तयार आहे. परंतु, बोलायचं म्हणून बोलायचं आणि दिघे साहेबांच्या नावाने स्वतःला टीआरपी मिळवून घ्यायचा, हा केविलवाणा प्रकार त्यांच्याकडून दिसतो”, असं केदार दिघे म्हणाले.

“हे लोक साहेबांची प्रतिमा मलिन करत आहेत. गेली २२ वर्षे पाहिलं तर यांचे फोटो मोठे झाले. दिघे साहेबांचा फोटो त्यांच्या फोटोमागे जायला लागला. काही ठिकाणी फोटो लागलेच नाहीत. हे राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे. दिघेसाहेबांच्या नावाने लोकांच्या कल्याणाचे कार्यक्रम होणार असतील तर चांगलं आहे, पण त्यांच्या नावाने राजकारण होणार असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे”, असंही केदार दिघे म्हणाले.

“दिघे साहेब हे एका पक्षापुरते मर्यादित नव्हते. अनेकवेळा पाहिलं असेल तर दिघेसाहेबांकडे येणारा वर्ग एकवर्गीय नव्हता. सर्व जातीधर्मातील लोक आनंद मठात येत होते. त्या पक्षातील सत्तेत होते किंवा नव्हते त्यांचेही वैयक्तिक नाते दिघे साहेबांसोबत होते. दिघे साहेब कमकुवत होते, असं बोलून दिघे साहेबांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला गेला. गेल्या १० महिन्यांत शिवसेनेचं नाव तुम्ही चोरलंत, पक्ष तुम्ही चोरलात, चिन्ह तुम्ही चोरलंत, आणि त्यावरून दिघेसाहेबांची तत्व शिकवत आहात? दिघेसाहेब भगव्याशी एकनिष्ठ होते. दिघेसाहेबांच्या पश्चात अनेक पदे उपभोगली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाल पदे उपभोगली. आणि गेल्या सहा आठ महिन्यांत असं काय घडलं की ते पक्षावर दावा करत आहेत” असा सवालही केदार दिघे यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *