क्वारंटाईन व्यक्तींनी विवाह समारंभ व अंत्यविधीसाठी उपस्थित राहू नये;
अन्यथा गुन्हा दाखल होणार जिल्हाधिकारी यांचे निर्देश
महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – बीड – संजीवकुमार गायकवाड – : जिल्ह्यात इतर कोणत्याही जिल्ह्यातून, राज्यातून व्यक्ती आल्यास त्यांनी अंत्यविधी व विवाह समारंभासाठी उपस्थित राहू नये व कडकपणे २८ दिवस होम क्वारंटाईनचे नियम पाळावेत. जर अशी कोणतीही व्यक्ती या नियमाचे उल्लंघन करत असल्यास किंवा सदरील कार्यक्रमास उपस्थित राहिल्यास संबंधित व्यक्ती व ज्यांचे मार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशा व्यक्ती विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला आहे.
शासनाच्या आदेशानुसार अंत्यविधीसाठी दहा व विवाह समारंभासाठी ५० व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे परंतु इतर जिल्हा, राज्यांमधून व्यक्ती आल्यास त्यांनी स्वतः शासन नियमानुसार आल्यापासून 28 दिवस कडकपणे येथील परिवारासह होम क्वारंटाईन होणे अपेक्षित असते. परंतु ते असे न करता अंत्यविधी व विवाह समारंभ समारंभासाठी सामील होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत असल्याने जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्तींनी क्वारंटाईनची नियमावली काटेकोरपणे पाळावी असे आदेशित केले आहे. यात विवाह समारंभ पुरती वधू-वर व त्यांचे आई-वडील यांना तसेच निधन झालेल्या व्यक्तीचे सख्खे नातेवाईक यांना अंत्यविधीपुरती सूट देण्यात येत आहे. तसेच नागरिकांनीही अशा कार्यक्रम, विधींना उपस्थित राहणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.