महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । राज्यात दमदार पाऊस बरसतोय. ठिकठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय. मुंबईसह राज्यातील विविध भागात धोधो पाऊस कोसळतोय. लोणावळ्यात सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी पाऊस कोसळतोय. मात्र तरिही लोणावळ्यातील नागरिकांना एक चिंता सतावते आहे. तर रत्नागिरीतील चिपळूणमध्येही जोरदार पाऊस पडतोय. वाशिष्टी नदीलाही पूर आलाय. भंडारा, गोंदिया या भागातही पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे.
पुण्यासह पालघर, सातारा आणि रायगडमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या चारही जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
शिवनदीनेही धोक्याची पातळी ओलांडली होती. नगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला होता. चिपळूण शहरातील सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे. तर पुढील चार दिवसात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद
पुण्यातील थंड हवेचं ठिकाण असलेल्या लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील सलग दिवशी विक्रमी पाऊस कोसळतोय. गेल्या 24 तासांत इथं तब्बल 220 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर 48 तासांत तब्बल 434 मिमी पाऊस कोसळला आहे. असं असलं तरी यंदा आत्तापर्यंत झालेला पाऊल हा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2592 मिमी पाऊस बरसला होता. यंदा मात्र केवळ 1744 मिमी इतकाच पाऊस कोसळला आहे. जी चिंतेची बाब आहे.
वसई-विरारमध्ये जोरदार पाऊस
वसई-विरार, नालासोपारा भागातही जोरदार पाऊस सुरूच आहे. रात्रभर जोरदार पाऊस पडत नाल्यातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्याच्या काही सकल भागात पाणी साचलं आहे. शहरातील सर्व जनजीवन सुरळीत असून, वाहतूक व्यवस्थाही सुरळीत सुरू आहे. पावसाच्या संतातधारेमुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. मध्यरात्री 12 वाजल्यापासून विरार, नालासोपा-याची लाईट बंद आहे. आभाळ पूर्णपणे काळेकुट्ट असून आज दिवसभर जोरदार पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीतील वाशिष्टी नदीला पूर
रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. वाशिष्टी नदीला पूर आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.