महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे तब्बल पंधरा वर्षे खजिनदार राहिलेल्या तसेच जळगाव शहरातील राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्ससह त्यांच्या मुंबई, नाशिकसह विविध ठिकाणच्या सहा कंपन्यांवर सक्तवसुली संचालनालय (ई डी) आणि आयकर विभागाने गुरुवारी छापेमारी केली.
जळगावसह नाशिकमधील एकूण सहा कंपन्यांवर ही छापेमारी करण्यात आली. पहाटे चार वाजेपर्यंत या सर्वच ठिकाणी चौकशी सुरू होती. चौकशी कोणत्या कारणाने करण्यात आले हे मात्र कळू शकले नाही.
मुंबई,नागपूर,औरंगाबादसह विविध जिल्ह्यातून ईडी पथकाच्या दहा गाड्या गुरुवारी एकाच वेळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्या. माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीच्या जळगाव सह नाशिक मधील एकूण सहा कंपन्यांवर त्यांनी एकाच वेळी छापेमारी करत त्या ठिकाणी असलेल्या मालमत्ता आणि कागदपत्रांची तपासणी सुरू केली. सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली. यात माजी आ.मनीष जैन हे यांचीही अधिकाऱ्यांनी चौकशी करून त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती घेतल्याची माहिती आहे.
६० जणांच्या ईडी च्या पथकाकडून चौकशी केली जात होती चौकशी सुरू असताना ग्राहकांना आतमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. तसेच आतमधील कर्मचाऱ्यांनाही बाहेर उभा करण्यात आले होते. दोन्ही पथकं कोणत्या कारणासाठी चौकशी करीत आहेत हे अद्याप समोर आलेले नाही . पहाटे चार वाजेपर्यंत विविध आस्थापनांमध्ये कागदपत्रांसह वेगवेगळ्या माध्यमातून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून चौकशी सुरू होती.
स्टेट बँक कडून घेतलेल्या सहाशे कोटी रुपयांच्या थकीत कर्ज विषयक ही कारवाई असल्याचं सांगितलं जातं आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सुद्धा सीबीआय ने राजमल लखीचंद ज्वेलर्सची चौकशी केली होती. यादरम्यान ईश्वरलाल जैन यांच्याकडून थकीत कर्जापैकी एकूण ४० कोटींची रक्कम भरण्यात आली होती व कारवाईला तात्पुरती स्थगिती घेण्यात आली होती. आज होत असलेल्या या चौकशी बाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.