महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ मे ।। राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत असल्या, तरी काही भागात मात्र उकाडा कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून बहुतांश जिल्ह्याचं तापमान चाळीशीपार गेलं आहे. धुळे आणि जळगावमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तर मुंबईत देखील चांगलाच उकाडा जाणवत आहे. अशातच नागरिकांना उकाड्यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
कारण, हवामान खात्याने आज मंगळवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. आजपासून पुढील ५ दिवस ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, तर काही भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह, कोकणात आज उष्ण व दमट वातावरण असेल. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे.
दुसरीकडे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्हांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली येथे वादळी पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यात गारपीट होऊ शकते, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.