फटाक्यांच्या आतषबाजीने पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ नोव्हेंबर ।। दिवाळीनिमित्त झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने शहर आणि उपनगरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. काही भागातील हवा तर धोकादायक पातळीवर पोहोचली असून, धोकादायक स्तरातील हवेमुळे श्वसनास त्रास होण्यासह आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

धुलिकणांचे हवेतील प्रमाण वाढल्यावर हवेची गुणवत्ता बिघडते. फटाके, बांधकामे अशा विविध कारणांनी हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. शुक्रवारी लक्ष्मीपूजनानंतर शहर आणि उपनगरांमध्ये झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता बिघडली आहे. शुक्रवारी रात्रीच हवा गुणवत्ता निर्देशांक ११५च्या पुढे गेला होता. हवेच्या गुणवत्ता निकषानुसार ५० पर्यंत निर्देशांक असल्यास हवेची गुणवत्ता निर्धोक मानली जाते. समाधानकारक स्तरात ५१ ते १०० पर्यंत निर्देशांक असल्यास हवेतील काही प्रदूषणकारी घटक त्रासदायक ठरू शकतात. साधारण स्तरात १०१ ते २०० दरम्यान निर्देशांक असल्यास मुले आणि ज्येष्ठांना श्वसनासाठी त्रास होतो. वाईट स्तरात २०१ ते ३०० या दरम्यान निर्देशांक असल्यास सर्वांवरच त्याचा विपरीत परिणाम होतो. अतिवाईट स्तरात ३०० पेक्षा जास्त निर्देशांक असल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

लक्ष्मीपूजन झाल्यानंतर उडवलेल्या फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. या धूरकट वातावरणाचा परिणाम शनिवारीही दिसून आला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार हवा गुणवत्ता निर्देशांक शिवाजीनगर येथे २५४, भूमकरनगर येथे १७४, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे २९८, कर्वे रस्ता येथे २०९, हडपसर येथे २८१, लोहगाव येथील म्हाडा कॉलनी येथे १५४, पंचवटी येथे १९६ नोंदवला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *