Shivshahi Bus : एसटीतून शिवशाहीचा ‘प्रवास’ संपणार; लालपरीत होणार रूपांतर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ डिसेंबर ।। राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातून शिवशाहीचा प्रवास आता संपणार आहे. वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने शिवशाही बसची सेवा थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवशाही बस गाड्यांमध्ये तांत्रिक दोष असल्याचे निष्पन्न झाल्यावर प्रशासनाने हा मोठा व महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

शिवशाही बसच्या अंतर्गत व बाह्य रचनेत आवश्यक तो बदल केला जाणार असून त्याचे रूपांतर साध्या अर्थात ‘लालपरी’ बसमध्ये होणार असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

गोंदियामध्ये शिवशाही बसच्या झालेल्या अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला. यापूर्वी देखील शिवशाहीचे राज्यात अनेक ठिकाणी अपघात झाले आहेत. शिवशाही बसमध्ये पहिल्या पासून तांत्रिक दोष असल्याचे आढळून आले होते. मात्र त्यावेळी एसटी प्रशासनाने यावर कोणताही निर्णय घेण्याच्या तयारीत नव्हते.

मात्र शिवशाही बद्दल वारंवार तक्रारी वाढल्याने एसटी प्रशासनाच्या वाहतूक विभागाने शिवशाहीला सेवेतून काढून टाकण्याचा प्रस्ताव दिला. यांत्रिक विभागाने देखील यावर आपली ‘मोहोर’ उमटवली आहे. त्यामुळे येत्या महिन्यांतच शिवशाहीच्या चाकांना पूर्णविराम लागणार आहे.

असा होणार शिवशाहीत बदल

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या एकूण ८९२ शिवशाही बस आहेत. पैकी ५०० बस प्रवासी सेवेत धावत आहेत. तर ३९२ बस या कार्यशाळेत विविध कारणांसाठी दाखल झालेल्या आहेत. या सर्व शिवशाही बस मधून वातानुकूलित यंत्रणा काढण्यात येणार आहे.

काचा काढून टाकणे, सीटच्या रचनेत बदल करणे तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे चालकांनी शिवशाही चालविताना ज्या अडचणी प्रशासन समोर मांडल्या होत्या. त्या सर्व अडचणी दूर करून शिवशाहीचे रूपांतर साध्या बसमध्ये केले जाणार आहे.

सुरुवातीपासूनच तक्रारी

नियोजनाचा अभाव

ठेकेदाराची मनमानी

शिवशाही बसच्या देखभाल दुरुस्ती याकडे ठेकेदाराचे होणारे दुर्लक्ष

ठेकेदाराच्या चालकाची मनमानी, कुठेही बस थांबवणे, प्रवाशांशी उर्मट भाषेत बोलणे, एसटी कर्मचाऱ्यांशी उद्धट भाषा वापरणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *