महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनिवार दि. ८ मार्च ।। प्रधानमंत्री सौरघर योजनेच्या धर्तीवर राज्यात नवीन योजना सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे राज्यभरातील सुमारे 70 टक्के वीज ग्राहक बिलमुक्त होतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. सोबतच, शेतकर्यांना वर्षाचे 365 दिवस वीज उपलब्ध केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नवीन वीज धोरणांतर्गत स्मार्ट मीटर बसवणार्या ग्राहकांना आणि जे दिवसा वीज वापरतील त्यांना 10 टक्के सवलत वीज दरात दिली जाणार आहे. हे ग्राहक आपल्या विजेच्या वापरावर अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवू शकतील.यामुळे राज्याच्या ऊर्जा बचतीला हातभार लागेल. जी वीज आपल्याला 8 रुपयांना पडत होती ती आता केवळ 3 रुपयांना पडणार आहे. म्हणजे युनिटमागे आपण 5 रुपये वाचवत आहोत. याचा जवळपास 70 टक्के ग्राहकांना थेट फायदा होणार आहे.
राज्यातील 70 टक्के ग्राहक हे शून्य ते शंभर युनिट वीज वापरणारे आहेत. सरकारच्या नव्या योजनेनुसार, या ग्राहकांना सौरऊर्जा प्रकल्पांतर्गत वीज मोफत मिळणार आहे. त्यांना सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे दीड कोटी ग्राहकांना वीज बिलाचा भार सहन करावा लागणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
बळीराजा मोफत वीज योजना
मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेल्या बळीराजा मोफत वीज योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. बळीराजा मोफत वीज योजना लागू करण्यात आली असून, याचा फायदा तब्बल 45 लाख कृषिपंपधारकांना होणार आहे. या योजनेसाठी सरकारने 14 हजार कोटी रुपये तरतूद केली आहे. यामध्ये शासनाच्या सबसिडीची 5,500 कोटींची बचत होणार आहे. सोबतच, एकूण वीज खरेदी खर्चात 10 हजार कोटी रुपयांची बचत या माध्यमातून होईल.