Sanjay Raut : “शिवसेना-भाजप युती तुटू नये, यावर त्यावेळी फडणवीस ठाम होते, पण…” संजय राऊत म्हणाले …..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. २५ मार्च ।। कुठल्याही परिस्थितीत शिवसेना-भाजप युती तुटू नये, यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्यावेळी आग्रही होते, असं म्हणत शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बॉम्ब टाकला. नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी नेहमीचा शिरस्ता मोडत सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पत्रकार परिषद घेतली. यावेळी सेना-भाजप संबंधांविषयी बोलताना राऊतांनी पुन्हा एकदा फडणवीसांची कड घेतल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

संजय राऊत काय म्हणाले?
“बाळासाहेब ठाकरे आपल्या बरोबर असतील, तरच या देशात आपण प्रखर हिंदुत्वाचा प्रचार करु शकतो, असं भाजप नेत्यांचं त्यावेळी मत होतं. म्हणून ते शिवसेनेच्या जवळ आले. हिंदूहृदयसम्राट हे महान हृदयाचे नेते होते. त्यांनी सांगितलं, की मतांची विभागणी नको, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण एकत्र काम केलं पाहिजे. बाबरी प्रकरणानंतर, अयोध्येच्या राम मंदिर आंदोलनानंतर आम्ही संपूर्ण देशात निवडणुका लढणार होतो. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची एक लाट देशात तयार झाली होती.” असं संजय राऊत म्हणाले.

“शिवसेनेच्या नावाचं तुफान होतं. लोकसभेला उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात अशा हिंदी भाषिक पट्ट्यात ६० ते ६५ जागा लढायचं आमचं ठरलं होतं. या लाटेत आमच्या किमान ४० जागा निवडून आल्या असत्या, याची आम्हाला खात्री होती. आमची तयारी सुरु असतानाच आम्ही हे ज्यावेळी जाहीर केलं, तेव्हा भाजपचे धाबे दणाणले.” असं संजय राऊत म्हणाले.

“अटल बिहारी वाजपेयी यांचा बाळासाहेबांना फोन आला. त्यांनी सांगितलं की, तुम्ही देशभरात निवडणुका लढत आहात, त्यामुळे भाजपचं नुकसान होऊ शकतं. हिंदुत्ववादी मतं विखुरतील. त्यामुळे भाजप हरेल, काँग्रेसला फायदा होईल. मी तुम्हाला विनंती करतो, की तुम्ही तुमचे उमेदवार मागे घ्या. बाळासाहेब महान हृदयाचे माणूस होते. त्यांनी आम्हाला सांगितलं, की राज्याबाहेरचे उमेदवार मागे घ्या. अटलजींचा फोन होता, आपण त्यांचा सन्मान राखला पाहिजे. राष्ट्रीय स्तरावर आम्हीच होतो, पण आम्ही त्याग केला” असं संजय राऊत सांगत होते.

“२०१४ साली एका-एका जागेवर ७२-७२ तास चर्चा चालली आहे. मी होतो त्यात. ओम माथुर त्यांचे प्रभारी होते. आम्ही त्यांचा सगळा खेळ पाहत होतो. पण मी एक नक्की सांगेन, की देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थिती शिवसेना-भाजप युती तुटू नये, या मताचे होते. हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो. तेव्हा युतीसंदर्भात त्यांची भूमिका सकारात्मक होती, तरीही भाजपचा वरुन कार्यक्रम आला, त्यानुसार युती तुटली.” असं संजय राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *