अदिती तटकरे रायगडमध्ये, अजितदादा बीडमध्ये ध्वजारोहण करणार, तर नाशिकला….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ ऑगस्ट ।। पालकमंत्रीपदाचा वाद शिगेला पोहोचला असताना, आता 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोण करणार याबाबतचा निर्णय जाहीर झाला आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीमध्ये तणाव आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे (Aditi tatkare) विरुद्ध शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्यात संघर्ष आहे. तर नाशिकमध्ये भाजपचे गिरीश महाजन विरुद्ध शिवसेनेचे दादा भुसे असा वाद आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार रायगडमध्ये अदिती तटकरे तर नाशिकमध्ये गिरीश महाजन हेच ध्वजारोहण करणार आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मंत्री भरत गोगावलेंची (Bharat gogawale) भाषा बदलल्याचंही पाहायला मिळालं होतं.

राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोण पालकमंत्री याची यादी या वर्षाच्या सुरुवातीला 18 जानेवारीला जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच म्हणजे 19 जानेवारीला नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्र्यांची निवड काही तासातच रद्द करण्यात आली होती. रायगडच्या पालकमंत्रिपदी अदिती तटकरे आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, महायुतीतील तणावानंतर या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली होती. अद्यापही येथील पालकमंत्रीपदाचा वाद कधी राज्यात तर कधी दिल्ली दरबारी पोहोचत आहे. मात्र, आता महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील ध्वजारोहण सोहळ्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आदिती तटकरे यांच्याचहस्ते ध्वजारोहण होणार आहे. तर, नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्याहस्ते ध्वजारोहण होईल.

राज्याचे रोजगार आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनाच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावं अशी भूमिका शिवसेना आमदारांनी घेतली आहे. तर, दुसरीकडे मंत्री अदिती तटकरे यांनाच पालकमंत्रीपद मिळावं असा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यातच, मंत्री भरत गोगावले यांनी गेल्याच आठवड्यात पालकमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटला तर ठीक नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असे गोगावले म्हणाले. यावरुन एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याच्या भेटीगाठी नंतर कोणता तरी तोडगा निघाला असावा म्हणूनच मंत्री भरत गोगावले अशी सौम्य भाषा करत आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यातच,

अजित पवारांच्याहस्ते बीडचे ध्वजारोहण
उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यंदा ध्वजारोहनासाठी बीडला जाणार आहेत. त्यामुळे, पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडणार आहे. पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार ध्वजारोहन सोहळ्यासाठी बीडला जाणार आहेत. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात त्यांनी बीड दौरा केला होता, तेव्हा बीडच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत गुन्हेगारांना थेट इशाराही दिला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *