![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १८ फेब्रुवारी २०२६ || स्वराज्य ही केवळ भूमी नव्हती, ती एक जाज्वल्य शपथ होती. त्या शपथेवर रक्ताची सही करणारे अनेक शिलेदार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोवती वज्रभिंतीसारखे उभे राहिले. पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे हजारो शत्रूंशी दोन हात करत राहिले, जोवर महाराज विशालगडावर सुखरूप पोहोचले नाहीत. सिंहगडासाठी “आधी लगीन कोंढाण्याचं” म्हणत तान्हाजी मालुसरे यांनी प्राण दिले आणि गड जिंकला. पुरंदरच्या रणांगणात मुरारबाजी देशपांडे दिलेरखानासमोर अडथळा बनले; शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले.
पन्हाळगडाच्या वेढ्यात शिवा काशीद यांनी महाराजांचा वेष धारण करून स्वतःला शत्रूकडे सुपूर्द केले—स्वराज्यासाठी हसत हसत मृत्यूला कवटाळणारे हे अद्वितीय बलिदान! सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांनी केवळ सहा शिलेदारांसह बहलोलखानावर धडक देत असमान लढा दिला. साल्हेर-मुल्हेरच्या रणात सूर्यराव काकडे तोफेच्या माऱ्यात कोसळले, पण पराक्रमाची पताका उंचावली. स्वराज्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात बाजी पासलकर यांनी जेजुरीच्या पठारावर शौर्य गाजवत प्राण अर्पण केले.
चाकणच्या भुईकोटात ५५ दिवस शत्रूला रोखून धरणारे फिरंगोजी नरसाळा—लाखाच्या फौजेपुढेही न झुकणारी निष्ठा! प्रतापगडाच्या पायथ्याशी जिवा महाला यांनी सय्यद बंडाचा हात छाटत महाराजांचे प्राण वाचवले. आणि स्वराज्य स्थापनेच्या शपथेपासून अखेरच्या श्वासापर्यंत साथ देणारे कान्होजी जेधे—वतने, कुटुंब, स्वार्थ यांची तमा न बाळगता त्यांनी निष्ठेचा आदर्श घालून दिला.
हे शिलेदार म्हणजे स्वराज्याच्या इतिहासातील तेजस्वी अध्याय. त्यांच्या रक्ताने लिहिलेल्या या गाथा आजही सांगतात—स्वराज्य शब्द नाही, तो त्याग, शौर्य आणि निष्ठेचा ज्वालामुखी आहे! 🔥⚔️
