✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ मार्च २०२६ ।। शिक्षणाच्या हक्कावर ‘अंतराची मर्यादा’ लादणारी अट अखेर गळून पडली आणि आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोठा दिलासा मिळाला. आतापर्यंत १ किमीच्या चौकटीत अडकलेले पालक आता ३ किमी आणि त्यापलीकडील शाळाही निवडू शकणार आहेत. म्हणजेच, शिक्षणाचा हक्क आता खऱ्या अर्थाने ‘मर्यादामुक्त’ झाला आहे. न्यायालयाच्या निरीक्षणानंतर घेतलेला हा निर्णय केवळ तांत्रिक बदल नाही, तर हजारो कुटुंबांच्या शैक्षणिक स्वप्नांना मिळालेली नवी उंची आहे. ज्या पालकांना आपल्या मुलासाठी चांगली शाळा हवी होती, पण अंतराची अट अडथळा ठरत होती, त्यांच्यासाठी ही संधी म्हणजे अक्षरशः ‘सुवर्णद्वार’ ठरली आहे.
या निर्णयामुळे आरटीईच्या मूळ उद्देशालाच बळ मिळालं आहे. ‘जवळची शाळा’ ही अट कागदावर योग्य वाटली, पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी ती अन्यायकारक ठरत होती. अनेक भागांत दर्जेदार शाळा १ किमीच्या आत नसल्याने पालकांना निकृष्ट पर्याय स्वीकारावा लागत होता. आता मात्र ही सक्ती संपली आहे. पालकांना अधिक पर्याय मिळणार, स्पर्धा वाढणार आणि त्यातून शिक्षणाचा दर्जाही उंचावणार—हा सकारात्मक बदल आहे. अर्थात, जास्त अंतराच्या शाळेत प्रवेश घेताना प्रवासाची जबाबदारी आणि खर्चही लक्षात घ्यावा लागणार आहे, पण तरीही ‘पर्याय’ मिळणे हीच मोठी जिंक आहे.
दरम्यान, अर्ज प्रक्रियेलाही २५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच, ज्यांनी आधीच अर्ज भरला आहे, त्यांनाही तो सुधारण्याची संधी मिळणार आहे. ही लवचिकता प्रशासनाच्या निर्णयाला अधिक व्यवहार्य बनवते. शिक्षणाच्या मैदानात आता अंतर नव्हे, तर संधी ठरणार आहे. आरटीईचा हा बदल केवळ नियमांपुरता मर्यादित न राहता, प्रत्येक घरात शिक्षणाची नवी आशा निर्माण करेल—अशीच अपेक्षा!
