महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ६ डिसेंबर -पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यभर कोरोनाचा प्रभाव कमी होत असला तरी चैत्यभूमिवर जाऊन गर्दी न करता महापरिनिर्वाण दिनी डॉ.आंबेडकरांना घरुनच अभिवादन करा. महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. दरवर्षी सातत्याने भीमानुयायांचा जनसागर भारताच्या कानाकोपऱ्यातून या महामानवाला अभिवादन करण्यासाठी येतो. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे यावर्षी अनुयायांनी अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ओळखून आपल्या आचरणाने आणि कृतीतून घरातूनच अभिवादन करावे, हीच खरी बाबासाहेबांना आदरांजली ठरेल, असे आवाहन पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केले आहे.
बनसोडे म्हणाले की, येणारा ६ डिसेंबर हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन आहे. समाजाप्रती त्यांचे कार्य आणि समर्पणाला वंदन करण्यासाठी देशभरातून भिमानुयायी आस्थेने येत असतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न देखील आहेत. ते आपल्या साऱ्यांचे आदर्श असून, आम्हीही त्यांचे अनुयायी आहोत. समाजात समानता प्रस्थापित व्हावी, म्हणून त्यांनी आजीवन संघर्ष केला. अन्यायाविरुद्ध बंड पुकारले. त्याचबरोबर भारताचे संविधान निर्माण करून देशाला कायदे, अटी, नियम, आचारसंहिता घालून दिल्या. असे असताना ज्या महामानवाने संविधान निर्माण केले त्यांच्या अभिवादनाच्या कार्यक्रमात जनतेचा जीव धोक्यात घालणे अनुचित ठरेल. म्हणूनच, ही वेळ आहे आपल्या आचरणातून एक सुजाण नागरिक असल्याची प्रगल्भता दाखविण्याची. आजही कोविडचा धोका आहे, तो नष्ट झाला असे मानने चूक आहे.
चैत्यभुमीवर गर्दी न करता डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी ज्या-ज्या काही गोष्टी करायच्या त्या सर्व केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमतरता येऊ दिली जाणार नाही. यापूर्वीही आपण सर्व सणवार साधेपणाने साजरे केले आहेत. डॉ. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण हा गांभीर्याने आणि अभिवादन करण्याचा प्रसंग आहे. त्यामुळे या कठीण काळात आपण जिथे आहात तिथूनच डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करा,असे आवाहन आमदार अण्णा बनसोडे यांनी केले आहे.