महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १४ मार्च – मुंबई भारतातील सर्वात मोठ्या ज्वेलरी कंपन्यांपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडने भांडवली बाजारातून निधी उभारणीची घोषणा केली आहे. १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी समभागांची प्रारंभिक समभाग विक्री योजना येत्या मंगळवारी १६ मार्च २०२१ रोजी खुली होणार आहे. १८ मार्च २०२१ पर्यंत गुंतवणूकदार यासाठी अर्ज करु शकतात. या योजनेत प्रती समभाग ८६ ते ८७ रुपये असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
या ऑफरमध्ये कंपनीच्या एकूण ११७५ कोटी रुपयांच्या इक्विटी समभागांच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगचा समावेश आहे. यामध्ये पुढील बाबी समाविष्ट आहेत. ८०० कोटींचे नव्याने जारी करण्यात आलेले समभाग (फ्रेश इश्यू) आणि ३७५ कोटी रुपयांच्या समभागांच्या विक्रीची ऑफर आहे. ज्यामध्ये टी एस कल्याणरामन (समभाग विक्रेते प्रमोटर) यांच्याकडून १२५ कोटींपर्यंतच्या इक्विटी समभागांची विक्री आणि हायडेल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड (समभाग विक्रेते गुंतवणूकदार) यांच्याकडून २५० कोटी रुपयांच्या इक्विटी समभागांची विक्री यांचा समावेश आहे.या ऑफरमध्ये पात्र कर्मचाऱ्यांना सबस्क्राईब करता यावे यासाठी एकूण २०० लाख रुपयांपर्यंत रिझर्वेशनचा (कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आलेला भाग) समावेश आहे. कमीत कमी १७२ इक्विटी समभागांसाठी आणि त्यापुढे १७२ इक्विटी समभागांच्या पटीत बोली लावली जाऊ शकते.
या ऑफरमधील कमीत कमी ५० टक्के भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (क्यूआयबी पोर्शन) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील. यासाठीची लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी ६० टक्क्यांपर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील.कल्याण ज्वेलर्सची देशभरात १०० हून अधिक दालने आहेत. तर परदेशात सुद्धा कल्याण ज्वेलर्सचा विस्तार आहे. पश्चिम आशियात कल्याण ज्वेलर्सचा ३० दालने आहेत. यापूर्वी कंपनीने १७५० कोटींचा आयपीओ आणण्याचा प्रयत्न केला होता. आर्थिक वर्ष २०२० मध्ये कंपनीला १४२ कोटींचा नफा झाला होता.