महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.२० एप्रिल ।राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. किराणा दुकानं, दूध, भाजीपाला दुकानांमध्ये गर्दी होत असल्याने या दुकानांची वेळ कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या नियमानुसार आता अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान आणि इतर दुकानं हे सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. राज्य सरकारकडून ही नियमावली जारी करण्यात आली आहे.
किराणा दुकान, भाजीपाला, फळविक्री, दूध विक्री दुकान (डेअरी), चिकन, मटण, मासे विक्री, पेट्रोल पंप, कृषी संबंधित सेवा, खासगी पेट्रोलपंप विक्री हे सकाळी सात ते अकरा याच वेळेत खुली राहतील.
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील.