महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जून । शाळा सुरु झाल्यानंतर ऑनलाईन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची उजळणी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी विशेष ब्रिज कोर्स निश्चित केला असून, ब्रीज कोर्सच्या माध्यमातून ही उजळणी 1 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हा ब्रीज कोर्स दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असणार आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशावर कोरोनाचे सावट आहे. गेल्या वर्षीपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे शिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी वर्षभरात ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे कौशल्य किती विकसित केले आहे. याची चाचपणी करण्यासाठी ब्रीज कोर्स घेर्यात येणार आहे. या उजळणीमध्ये एखादा विद्यार्थी पुढील वर्गामध्ये जात असताना त्याला मागील वर्गातील अभ्यासक कितपत समजला आहे. तसेच पुढील वर्गासाठी आवश्यक असलेले मागील वर्गातील धडे यांची उजळणी घेण्यात येणार आहे.
शाळा सुरू झाल्यानंतर ब्रीज कोर्सच्या माध्यमातून पहिले 45 दिवस मागील इयत्तेचा अभ्यासक्रम शिकवून त्याची उजळणी घेऊन त्यावर एक पेपर घेण्यात येणार आहे. यातून विद्यार्थ्याने किती कौशल्य प्राप्त केली याची चाचणी करण्यात येणार आहे. ब्रीज कोर्समध्ये सर्व विषयांचे पेपर आयोजित केले जाणार असले तरी प्रामुख्यानं गणित आणि विज्ञान विषयावर अधिक भर असणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक विकास गरड यांनी दिली.
या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी समजा सहावीत आहे. तेव्हा हा ब्रिज कोर्स पाचवीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. शाळा बंद असल्याने तसंच ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांना ज्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नाहीत पण ज्याच्याशिवाय पुढील अभ्यासक्रम शिकता येणार नाही असे महत्त्वाचे विषय आम्ही ब्रिज कोर्समध्ये घेत आहोत. प्रत्येक विषयाचा ब्रिज कोर्स वेगळा असणार आहे. म्हणजेच प्रत्येक विषयासाठी ब्रिज कोर्स उपलब्ध असेल. गणित आणि विज्ञान या दोन विषयांवर अधिक भर दिला जाणार आहे.