महाराष्ट्र २४- विधिमंडळ कामकाजाच्या तिसऱ्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीदिनी भाजपाने सावरकर यांचा गौरवपर प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सादर केला. तसेच हा ठराव सभागृहात मांडण्याची आक्रमक मागणी भाजपाकडून करण्यात आली. या पार्श्वभूमीवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले.
राज्य, देश उभारणीत ज्यांचे मोलाचे योगदान आहे त्यांचा आदर करावा. चांगल्या व्यक्तीच्या संदर्भात जर एखादी चर्चा येणार असेल तर त्याबाबत कोणालाही आक्षेप घेण्याचे कारण नाही. ज्या व्यक्ती हयात नाहीत अशा व्यक्तींबद्दल अनावश्यक विधाने करून गैरसमज पसवण्याचे काही काम नाही. सावरकरांचे योगदान नाकारता येणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
तसेच, विरोधकांनी काय करावे हा त्यांचा अधिकार आहे. आम्हाला सभागृह चालवायचे आहे. सभागृहात काम होणे महत्त्वाचे आहे. काल विरोधक सभागृहात गोंधळ घालत होते परंतु आम्ही एक विधेयक मंजुर करून घेतले. विधेयक मंजूर होणेही महत्त्वाचे असते असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, सभागृह हे नियमाप्रमाणे चालते. कामकाज सल्लागार समिती असते. सभागृहाचे अध्यक्ष असतात. एखादा विषय घ्यायचा असेल तर ऐनवेळीही घेता येतो. सर्वजण ठरवतील त्याप्रमाणे सभागृहाचे कामकाज चालेल असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.