महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ नोव्हेबर । ‘देशात फटाक्यांवर पूर्णतः बंदी आणता येणार नाही; परंतु त्यांचा गैरवापर रोखण्यासाठीची यंत्रणा अधिक मजबूत करावी लागेल,’ असे नमूद करून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पश्चिम बंगालमध्ये कालीपूजा, दिवाळी व अन्य सणांमध्ये यंदा फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्याचा कलकत्ता उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला.
न्या. ए. एम. खानवीलकर आणि अजय रस्तोगी यांच्या विशेष खंडपीठाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल केला. मात्र, प्रतिबंधित फटाके आणि संबंधित वस्तू राज्यात आयात केल्या जाणार नाहीत, याची प्रवेशद्वांवरच खात्री करण्याचे निर्देश पश्चिम बंगाल सरकारला दिले. दिवाळीच्या सुट्टीदरम्यानच्या प्रकरणांवर सुनावणीसाठी या खंडपीठाची नियुक्ती करण्यात आली आहे.
करोनासंसर्गाच्या पार्श्वभूमीवर वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्यात सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या विक्री, वापर आणि खरेदीवर बंदी घालणाऱ्या उच्च न्यायालयाच्या २९ ऑक्टोबरच्या आदेशाविरोधातील याचिकांवर सुनावणीवेळी खंडपीठाने हा निर्देश दिला. या वर्षी कालीपूजा, दिवाळी, छठपूजा, जगधात्री पूजा, गुरूनानक जयंती आणि ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कोणत्याही प्रकारच्या फटाक्यांचा वापर किंवा केले जाणार नाही याची काळजी राज्याने घ्यावी, असे उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले होते; तसेच सण-उत्सवांत केवळ मेण किंवा तेलाचे दिवेच वापरावेत, असे त्यात नमूद केले होते.