महाराष्ट्र २४ मुंबई : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात दहशत पसरली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे 10 रुग्ण आढळले आहे. हे 10 जण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, पण ते गंभीर नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसंच अर्थसंकल्पीय अधिवेशनही याच आठवड्यात गुंडाळणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
कोरोना व्हायरसबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन कोरोना व्हायरसबद्दल राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करत लोकांना दक्षता घेण्याचं आवाहन केलं आहे.
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसची दहशत आहे. राज्यात 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. पॉझिटिव्ह रुग्णं आहेत पण ते गंभीर नाहीत. एक ग्रुप परदेशातून राज्यात आला होता. त्यातून हे 10 रुग्ण आढळले. या ग्रुपमधील व्यक्तींचा ज्यांच्याशी संबध आला आहे. त्यांच्याही तपासणी सुरू आहे. यात दोन जण मुंबईतील आहे तर 8 जण हे पुण्यातील रुग्ण आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
‘परदेशातून आलेल्यांनी 14 दिवस घरात राहावे’
कोरोनाच्या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे. विमानतळांवर तपासणी सुरू आहे. जे परदेशातून आले आहे, त्यांनी घाबरून जाऊ नये. घरी आल्यानंतर निदान 14 दिवस घरातच राहावे, अशी खबरदारीची सुचनाही त्यांनी केली.
‘शाळा-कॉलेज बंद करण्याचा अद्याप निर्णय नाही’
शाळा कॉलेज बंद करण्यात येण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण, उद्या परिस्थिती काय आहे त्यानुसार निर्णय घेतला जाईल, तशी सुचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. ‘अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपशीर करून येत्या शनिवारी किंवा रविवारी कामकाज पूर्ण करून सर्व कर्मचारी त्यांच्या कामाच्या ठिकाणी परत जातील.’ असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.