पुणेकरांना दिलासा ! रुग्णसंख्या घटल्याने अजित पवारांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २७ फेब्रुवारी । जिल्ह्यातील करोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने उद्या, सोमवारपासून (२८ फेब्रुवारी) पुणे आणि पिंपरी येथील जम्बो रुग्णालय बंद करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले. याशिवाय दोन मार्चपासून जिल्ह्यातील पूर्वप्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या करोना आढावा बैठकीत जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या आणि लसीकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रमुख अधिकारी या वेळी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना ‘कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’ (सीओईपी) आणि पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियम या दोन्ही ठिकाणची ‘जम्बो’ रुग्णालये बंद करणार असल्याचे पवारांनी नमूद केले. ‘सीओईपी’चे मैदान पुन्हा पूर्वीसारखे करून देण्याचा आदेशही त्यांनी दिला.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत वाढत्या रुग्णांच्या तुलनेत खाटांची संख्या अपुरी असल्याने ‘जम्बो’ रुग्णालय उभारण्यात आले होते. मात्र, तिसऱ्या लाटेत करोनारुग्णांची संख्या वाढली नाही. या दोन्ही रुग्णालयांतील उपलब्ध खाटांपेक्षा अधिक खाटा पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ससून रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आल्या. त्यामुळे या रुग्णालयांची सर्व व्यवस्था काढून घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

शहर आणि जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील रुग्णांचे प्रमाण ५१ टक्क्यांनी घटले आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद थंडावल्याचे निरीक्षण पवार यांनी नोंदविले. अद्याप दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणे, ज्येष्ठ नागरिकांचा प्रीकॉशन डोस देण्यासाठी आणि १५ ते १८ या वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या दोघांनी नवाब मलिक प्रकरणात पक्षाची भूमिका स्पष्ट केली असून, त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, असे अजित पवार यांनी ठणकावले. ‘मलिक यांना जाणीवपूर्वक घेरण्यात आले आहे. सरकारमधील मंत्र्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जात असेल, तर सर्वच मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी होईल, असे कसे चालेल,’ असा सवालही त्यांनी केला.

करोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने आणखी काही निर्बंध शिथिल करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. सर्व लोकप्रतिनिधी, वैद्यकीय तज्ज्ञ आणि टास्क फोर्स यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल.

– अजित पवार, उपमुख्यमंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *