महाराष्ट्र २४- ऑनलाईन ;मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव प्रशासनाच्या वाटेतील मोठा अडथळा झाल्यामुळे आता मंत्रीमंडाळील प्रत्येक व्यक्ती आपल्या परिने नागरिकांना त्यांच्या घरातच थांबण्याचं आवाहन करत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने जनतेला दिलासा आणि धीर देत आहेत. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा त्यांचं कर्तव्य बजावत वेळोवेळी नागरिकांना घरातच राहण्याचा इशारा देत आहे.
एका दिवसावर आलेल्या हनुमान जयंतीचा उत्सव आणि या दरम्यान राज्यातील बऱ्याच भागांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या पालख्या, देवाच्या जत्रा हे चित्र यंदाच्या वर्षी मात्र दिसणारम नाही. या दिवसाचं महत्त्व पाहता खुद्द अजित पवार यांनी नागरिकांना एक आवाहन केलं आहे. हनुमान जयंतीला घरातच थांबण्याची गरज आहे, असं सांगून हनुमान जयंतीला, बुधवारी घराबाहेर न पडण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
मुस्लिम धर्मियांनीही बुधवारी शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, पूजा, अर्चा, प्रार्थना घरातच करावी, असंही त्यांनी म्हटलं. कोरोनासंसर्गाची साखळी तोडणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक व्यक्तीचं आज एकमेव कर्तव्यं आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणं, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणं, कोरोनाला प्रसाराची संधी न देणं आणि कोरोनाची साखळी तोडणं, ही आपली जबाबदारी आहे हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.