महाराष्ट्र २४- ऑनलाईन – नवी दिल्ली : कोरोनाच्या परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर एक बैठक घेतली होती. अशी बैठक देशव्यापी लॉकडाउन सुरू व्हायच्या आधीही झाली होती त्यानंतरही एकदा ती झाली आता 21 दिवसांचा लॉकडाऊनचा काळ संपत आला असताना पंतप्रधान 11 एप्रिलला पुन्हा एकदा राज्यांच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. मागील बैठकीत त्यांनी मुख्यमंत्र्यांना कोरोनाशी लढा कसा द्यायचा, लॉकडाऊननंतर काय करायचे याविषयी सूचना देण्यास सांगितले होते. आता 11 एप्रिलची बैठक मुख्यतः लॉकडाऊनसंदर्भातच असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्वपक्षीय बैठक घेतली. त्यात 21 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले. लॉकडाऊननंतरही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. तो कमी होण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे या परिस्थितीत लॉकडाऊन सरसकट उठवणे योग्य नसल्याचे पंतप्रधान म्हणाले. ते आता हीच चर्चा मुख्यमंत्र्यांबरोबर करतील आणि त्यानंतरच लॉकडाऊनचा निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.