ई-बाइकला आग लागण्याच्या घटना ; धक्कादायक कारण समोर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० मे । कमी पॉवरच्या ई-बाइकमध्ये अनधिकृतपणे बदल करून त्याची विक्री होत असून, त्यामुळे वाहनांना आग लागण्याच्या घटना घडत असल्याची बाब परिवहन आयुक्तालयाच्या निदर्शनास आली आहे. परिणामी, ई-बाइकची खरेदी करताना नागरिकांनी संबंधित वाहनांच्या मान्यतेच्या पत्राची मागणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात सद्यस्थितीत ६६ हजार ४८२ इलेक्ट्रिक वाहनांची नोंद आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार ई-बाइक वाहनांना नोंदणी करातून सवलत दिली आहे; तसेच बॅटरीची क्षमता २५० वॉटपेक्षा कमी असलेल्या आणि ताशी २५ किलोमीटरपर्यंत वेगमर्यादा असलेल्या वाहनांना आरटीओ नोंदणीची आवश्यकता नाही. या वाहनांची विक्री करण्यापूर्वी वाहन उत्पादक आणि वाहन वितरक यांच्याकडे त्या वाहनाचा ‘टाइप अप्रूव्हल टेस्ट रिपोर्ट’ आणि परिवहन आयुक्तालयाच्या परवानगीची प्रत आवश्यक असते. मात्र, काही वाहन उत्पादक मान्यताप्राप्त संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय ई-बाइकची विक्री करतात.

मान्यता मिळालेल्या वाहनांत बेकायदा बदल करून, बॅटरीची क्षमता २५० वॉटपेक्षा जास्त किंवा वेगमर्यादा वाढवली जाते. अशा प्रकारे बेकायदा बदल करून वाहन विक्री केल्यास रस्ता सुरक्षेस गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असे परिवहन आयुक्तालयाने नमूद केले आहे. त्यामुळे राज्यात अनधिकृतपणे ई-बाइकची विक्री करणाऱ्या वाहन उत्पादक आणि वितरकांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा आदेश परिवहन आयुक्ताने सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *