अनुशासन आणि आत्मबळ देशात करोनाला पराजित करेल : सोनिया गांधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी देशाला संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी तीन तास अगोदर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देशातील नागरिकांना उद्देशून एक व्हिडिओ संदेश दिलाय. काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये सोनिया गांधी यांनी करोनासारख्या संकट काळात डॉक्टर, सफाई कर्मचारी, पोलीस प्रशासन यांसहीत सरकारी अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या हिंमतीला ‘याहून मोठी देशभक्ती असू शक नाही’ असं म्हणत दाद दिलीय. एकता, अनुशासन आणि आत्मबळ देशात करोनाला पराजित करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.

‘आज करोनासारख्या संकटाशी दोन हात राहण्यापेक्षा मोठी देशभक्ती आणखीन काय असू शकते. आम्ही या कठीण काळात तुमच्या कुटुंबीय पत्नी, पती, मुलं, माता – पिता यांचं त्याग आणि बलिदान कधीही विसरू शकत नाही. धोका माहीत असूनही तुमचं सहकार्य आणि समर्पणामुळे आपण ही लढाई लढत आहोत. धन्यवाद देण्यासाठी माझे शब्दही अपुरे पडतील’ असं म्हणत करोना योद्ध्यांच्या कुटुंबीयांप्रती सोनिया गांधी यांनी संवेदना व्यक्त केल्या.

 

‘मेरे प्यारे देशवासियों, आपले योद्धे वैयक्तिक सुरक्षेचा अभाव असूनही ही लढाई जिंकण्यासाठी रात्र-दिवस प्रयत्न करत आहेत. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि समाजसेवी संघटना उपकरणांची कमतरता असूनही उपचार करत आहेत. पोलीस आणि जवान पहारा देऊन नियमांचं पालन करवून घेत आहेत. सरकारी अधिकारी २४ तास व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि लोकांपर्यंत सुविधा पुरवण्यासाठी मोठी मेहनत घेत आहेत. परंतु, तुमच्या आमच्या सहकार्याशिवाय ही लढाई कमजोर होईल आणि आपल्याला असं होऊ द्यायचं नाही’ असंही सोनिया गांधी यांनी आपल्या या संदेशात म्हटलंय.

यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही आवाहन केलं. ‘देश एवढी मोठी लढाई लढत असताना काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आपली जबाबदारी निभावत सर्व योद्ध्यांना मदत करण्यासाठी नेहमीच तयार आहे. तुम्ही कोणत्याही मदतीसाठी किंवा गरजेसाठी आपल्या राज्याच्या किंवा सेंट्रल कंट्रोल रुमशी संपर्क करू शकता. काँग्रेसचा जवान हरएक संभाव्य मदत करेल. काँग्रेस सरकारमध्ये असो किंवा विरोधी पक्षात, आम्ही प्रत्येक ठिकाणी आपल्यासोबत या लढाईत उभे आहोत. आम्हाला विश्वास आहे की देश लवकरच या संकटातून बाहेर येईल’ असंही सोनिया गांधी यांनी यावेळी म्हटलं.

संकटाच्या या कालात शांती, धैर्य आणि संयम राखण्यासाठी सोनिया गांधी यांनी जनतेचे आभार मानले. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *