महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२२ जून । राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन संवाद साधत शिवसेनेतील बंडखोरांना भावनिक आवाहन केलं. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रिपदी नको असेन तर काय करायचं? सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा माझ्यासमोर येऊन सांगायचं, तुम्ही मुख्यमंत्रिपदी नको.मी राजीनामा देण्यास तयार आहे. असं मुख्यमंत्र्यांनी यामध्ये जाहीर केलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील इमोशनल उत्तर दिलं आहे. शिंदे सध्या त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. त्यांनी यावेळी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचा दाखला देत उत्तर दिलं आहे. काँग्रेससोबत जायचं नाही, हे बाळासाहेबच बोलले होते. त्यावर मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत. समविचारी पक्षांसोबत राहायचं ही बाळासाहेबांचे हे मुख्य विचार आहेत, अशी भावनिक साद शिंदे यांनी घातली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांशी चर्चा करत असून या चर्चेनंतरच ते मुख्यमंत्र्यांना उत्तर देणार आहेत.